लहानपणापासुन नेहमी एक प्रश्न पडत असायचा. लोक एवढ्या सकाळी उठतात सूर्याची पूजा नित्यनियमाने करतात. कितीतरी वेळ हात जोडतात, मंत्र तंत्र काय काय पुतपुटतात. भीक मागितल्या सारखे तोंड करून हवे ते मागतात. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या हे करायचे नाही, ते करायचे नाही असा सांगावा करतात. मावळणार्या सूर्याला हवे तितके दूषणे देतात. सूर्यास्ताला अपशकून मानतात. खरं सांगायचे तर बरीच जनता उगवणाऱ्या सूर्यापेक्षा संध्याकाळचा सूर्य जास्त अनूभवत असतात. जास्त सानिध्य हे मावळणार्या सूर्याचे असते. तरीही अश्या प्रथा का असू शकतात?
मला वाटते मावळणारा सूर्य सुद्धा खूप सुंदर संधीप्रकाश देत असतो. आपल्या दिवसाचा शेवट किती मोहक आणि आल्हाद दायक करत असतो. पण आपण आपल्या पूर्वजांनी घालून प्रथेप्रमाणे चालत असतो. एका सुंदर दिवसाची अनुभूती आणि त्यापासून मिळणारी उर्जा आपल्याला सूर्यामुळेच मिळते.
सूर्य दुपारी तळपत असतो तेव्हा चटके पण बसतात. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही पण होते. पण शेवटी मानवाला सूर्याची गरज आहे. त्याच्या असण्यामुळे जगण्यासाठी मानवाला दाणा पाणी, जे काही लागते ते मिळत असते.
हीच मानसिकता माणसांच्या बाबतीतहि आहे. 'उगवत्याला नमस्कार' अशी एक म्हण देखील आहे. सूर्याच्या बाबतीतील विचार आपण माणसांच्याही बद्दल लागू करतो. आणि अशी प्रथा आता पडून गेली आहे. लहानपणीपासून हे निरीक्षण करत आलोय. असे सूर्यही आसपास पहिले आहेत.
असेच सूर्य माझे वडील - सुरेश नांगरे
अतिशय साध्या, पारंपारिक पद्धतीने कपडे व्यवसाय करणाऱ्या, कधीही कुणाची उठाठेव न करणाऱ्या गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अगदी साधेपणाने आयुष्य चालू होते. पण एकदा क्षेपणास्त्राला अवकाशात झेप घेण्यासाठी जशी ठिणगी द्यावी लागती तशी गावातील एका नाठाळाने दिली (चांगलेच काम केले). आणि त्यानंतर अगदी सामान्य कुटुंबातील आणि समाजातून एका सूर्याचा उगम झाला.
मी त्यांचा जीवनक्रम जेव्हा फोटोस च्या माध्यमातून पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते. जेव्हा ते भरात होते तेव्हा राजुरी सारख्या गावातील बाजारपेठ महाराष्ट्राच्या नकाश्यावर झळकत होती. नक्कीच त्यांना त्यांच्या सवंगड्यांची मोलाची साथ आणि प्रेम सुद्धा मिळाले.
त्यांनी काय केले याचा हिशेब मी या लेखात देऊ शकत नाही. कारण जेवढे केले आणि ज्यांच्यासाठी केले हे त्यांच्या आजच्या परिस्थितीतून दिसून येते. याविषयी दाखला देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी ती लोक प्रामाणिकपणे येत असतात आणि आम्हाला सांगत असतात कि त्यांच्यामुळे किती प्रगती करू शकलो. किती जणांचे आयुष्य घडले आहे.
इतिहास वाचला तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे कुणाही व्यक्तीचे 'कर्म' त्याचे नाव इतिहासात फार काळ गणले जाते. बाकी सारे विसरण्यासारखे असते. विरोधक आणि समीक्षक हे तर प्रयेकालाच असतात. यातून ना गांधी सुटले ना हि शिवाजी महाराज.
आज त्यांचा ६१ वा वाढदिवस. काल त्यांना भेटण्यासाठी मी गावी गेलो होतो. मी त्यांचे फोटोस पाहत असताना ते हसत होते. न बोलताच मी समजलो होतो ते का हसत होते. भरपूर बोलत होते.
माझे वडील माझे सूर्य आहेत. मला त्यांच्याकडून जगण्याची उर्जा मिळाली आहे. मी सूर्योदय अनुभवला, उन्हात तळपलो. पाय भाजले. पण आता त्यांचा संधिप्रकाश अनुभवायचा आहे. जुन्या प्रथा मोडायच्या आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !
Comments
Post a Comment